चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
नगर परिषद निवडणुकीचा नगारा नुकताच वाजला असून ऐन दिवाळीच नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. या दिवाळीत राजकीय आतषबाजी होणार असून अनेकांची दिवाळी साजरी होणार तर अनेकांचे दिवाळेही निघणार आहे.
थेट नगराध्यक्षांसह होणार्या निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी केवळ पाच दिवस मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षात धावपळ सुरू झाली आहे. चांदुर रेल्वेसह जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. ऑक्टोबर महिन्यातच दसरा दिवाळी आणि नगर परिषद निवडणूक असा अनोखा संगम चांदुर रेल्वे शहरासाठी नवीन अनुभव असेल. २६ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरुवात होणार आहे. तर २४ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन दाखल करावयाचे आहे. याची अंतिम तारीख नरक चतुर्दशीच्या दिवशी येत आहे. निवडणुकीची घोषणा केली आणि राजकीय पक्षांसहीत इच्छुक उमेदवारही जागे झाले. आता सर्वच पक्षांना उमेदवार शोधण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे. अवघ्या आठ दिवसात उमेदवार शोधून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करावे लागणार आहे. सर्वात दिव्य ठरणार आहे ते नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडताना शहराच्या सर्व भागात चालणारा उमेदवार शोधताना सर्वच पक्ष हात घाईस येणार आहे. यात शहरातील अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहे. प्रभागनिहाय राजकीय समीकरण हेरून आपल्यासोबत कोण उमेदवार घ्यायचा यावरही इच्छुकांचा कल सुरू आहे. अजूनपर्यंत प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यातच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे कमी कालावधीत उमेदवारांना मोठा पत्ता गाठायचा आहे. एका प्रभागात किमान दोन ते तीन हजार इतकी लोकसंख्या येते. त्यामुळे मिळालेल्या कालावधीत प्रचार आणि संपर्काचे अभियान राबवितांना या उमेदवारांचा चांगलाच कस या निवडणुकीत लागणार आहे..
via Blogger http://ift.tt/2emGa2F
from WordPress http://ift.tt/2em37jT
via IFTTT
No comments:
Post a Comment