Latest News

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसवर गंभीर ताशेरे ओढलेले असतांना डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील गप्प का ? – अभय वर्तक, सनातन संस्था

शासनाने अंनिसवर तात्काळ प्रशासक नेमावा ! 

श्री. हेमंत सोनावणे, श्री. अभय वर्तक आणि श्री. आेंकार डोंगरे

       सातारा – येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी डॉ. दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संदर्भातील चौकशी अहवालात गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, असे सांगून त्यावर प्रशासक नेमावा, असेही नमूद केले आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक रुढी-परंपरा यांच्या विरोधात सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारे, स्वत:ला नेहमीच विवेकवादी म्हणवून घेणारे डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील हे धर्मादाय आयुक्तांच्या गंभीर ताशेर्‍यांनंतर कोणत्या बिळात लपून बसले आहेत ? ते पत्रकार आणि समाज यांच्यासमोर येऊन उत्तरे देण्याचे धाडस का दाखवत नाहीत ? डॉ. हमीद दाभोलकर आणि अविनाश पाटील यांच्या या पलायनवादामुळेच अंनिसचा पुरोगामित्वाचा आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा बुरखा फाटला आहे अन् त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे. अंनिसचे घोटाळे इतके गंभीर आहे की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासक नेमावा आणि सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार दाभोलकरांच्या हत्येस त्यांच्या न्यासामधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ?, याची कसून चौकशी करावी, अशी मागणी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत केली. सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षकांचा चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाला असून त्यातून गंभीर सूत्रे समोर आली आहेत, असेही श्री. वर्तक यांनी या वेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आेंकार डोंगरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनावणे उपस्थित होते. 

गुन्हेगार नागोरी-खंडेलवाल यांना जामीन, तर 
निष्पाप समीर गायकवाड अजूनही कारागृहात का ?

       श्री. वर्तक पुढे म्हणाले, नागोरी आणि खंडेलवाल यांची अटक, त्यांच्याकडे सापडलेले दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी वापरलेले पिस्तुल आणि त्यांना मिळालेला जामीन याविषयी दाभोलकर कुटुंबीय आणि पुरोगामी यांना काहीही देणे-घेणे असल्याचे दिसत नाही. नागोरी आणि खंडेलवाल हे सनातनचे नाहीत; म्हणून त्यांच्या जामिनाला विरोध नाही; मात्र समीर गायकवाड हे सनातनचा साधक असल्याने त्यांच्या जामिनाला विरोध, हे कोणत्या विवेकात बसते ? ज्या नागोरीच्या पिस्तुलाचा बॅलेस्टीक रिपोर्ट स्कॉटलण्ड यार्डकडून येत आहे, असे कारण सांगून समीर गायकवाडचा जामीन रोखला जात आहे, त्या नागोरीला ३ मासांत जामीन मिळतो. त्या नागोरीने ४० लाख रुपये घेऊन एका बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी घेतल्याचे वृत्त नुकतेच एका नामवंत वृत्तपत्रात आले. एकीकडे दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराला दुसरे गुन्हे करण्यासाठी मोकळे सोडले जात आहे, तर दुसरीकडे समीर गायकवाड यांना जामीन मिळाला तर अनर्थ होईल, अशी (अ)विवेकवादी ओरड दाभोलकर कंपूकडून केली जात आहे. यातूनच चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण महाराष्ट्र शासनही सार्थ ठरवत आहे. मुख्यमंत्र्यांनी पुरोगाम्यांच्या अविवेकी दबावाला बळी न पडता आतातरी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी आणि सनातनला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या वेळी श्री. वर्तक यांनी केली, तसेच दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सर्वप्रथम अटक केलेले नागोरी आणि खंडेलवाल यांचा सीबीआयने काय तपास केला ? असा प्रश्‍नही या वेळी केला. 
       अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासामधील घोटाळ्यांविषयीच्या चौकशी अहवालातील ठळक सूत्रे या वेळी पत्रकारांसमोर मांडण्यात आली.

via Blogger http://ift.tt/2enfaMV




from WordPress http://ift.tt/2drtFNs
via IFTTT

No comments:

Post a Comment

Z Vidarbha News Letest Shared by Themes24x7 Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.